नवी दिल्ली – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने फुंकला असून दिल्ली येथे भाजपच्या झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या शेवटच्या दिवशी ‘आओ मिलकर कमल खिलायें’चा संकल्प भाजपने केला आहे. ‘अजेय भारत-अटल भाजपा’ अशी नवी घोषणा यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांना ही घोषणा समर्पित असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.
यावेळी, २०१९ ची निवडणूक म्हणजे विरोधकांसाठी दिवास्वप्न असून जनतेत एनडीएचे नेते नरेंद्र मोदी यांची स्वीकार्यता ७० टक्क्यांहून अधिक आहे. २०२२ पर्यंत ‘न्यू इंडिया’ हे सरकार वास्तवात आणेल. असा विश्वास भाजपच्या कार्यकारिणीने म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी बैठकीच्या शेवटी उपस्थितांना संबोधित केले. मोदी म्हणाले, आम्ही सत्तेला केवळ खुर्चीच्या स्वरुपात पाहत नाही, तर आम्ही सत्तेला जनतेसाठी काम करण्याचे उपकरण मानतो.
मोदींनी या बैठकीत विरोधकांवरही निशाणा साधला, एकमेकांना जे लोक पाहू शकत नाहीत, सोबत चालू शकत नाहीत, त्यांच्यावर आज गळाभेट घेण्याची वेळ आली आहे, असा टोलाही मोदींनी यावेळी लगावला. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. ते पंतप्रधान मोदींच्या हवाल्याने म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांनी भाजपच्या विचाराला, संस्काराला आणि नेतृत्वाला एक नवी उंची दिली आहे. आमचा सूर्य आज तर निघून गेला, मात्र आपण ताऱ्यांनी आपली चमक वाढवून आपल्या विचारधारेच्या प्रकाशाला पुढे न्यायला हवे. महाआघाडीकडे नेतृत्वाची कमतरता आहे. त्यांची नीती अस्पष्ट आहे आणि नियत भ्रष्ट आहे, असे मोदी म्हणाल्याचेही प्रसाद यांनी यावेळी सांगितले.
Post a Comment